सोमवार, ८ जून, २०१५

नवनव्या कार्यक्षेत्रांची माहिती करून घ्या! लोकसत्ता करिअर वृत्तान्त मुंबई दिनांक सोमवार ८ जून २०१५

दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरची दिशा सुस्पष्ट व्हावी, याकरता २९ व ३० मे रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स यांच्या सहकार्याने  'लोकसत्ता मार्ग यशाचा' या  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले. या परिसंवादात करिअर निवडीसंबंधित विविध पैलूंबाबत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश देत आहोत.
.
विवेक वेलणकर
करिअर समुपदेशक


सर्वप्रथम दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि पालकांचे त्याहीपेक्षा मनापासून अभिनंदन! कारण गेले वर्षभर तुम्ही तुमच्या पाल्यांमागे, 'अरे अभ्यास कर, अभ्यास कर' असा धोशा लावला असणार आणि तुमच्या मुलांनी तुमचे रक्त चांगलेच आटवले असणार. पण आता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि दहावीचाही काहीच दिवसांत जाहीर होईल. मग आता घराघरांत 'पुढे काय' या सार्वत्रिक प्रश्नाची चर्चा सुरू असेल. शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळ्यांनीच या प्रश्नाचे उत्तर आपापल्या परीने देऊन तुम्हाला भंडावून सोडले असेल. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न आताच्या वळणावर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तुम्हीच शोधायला हवे. त्यासाठी मदत म्हणून हा प्रपंच!
आपल्याकडे करिअर किंवा दहावीनंतर शाखा निवडीच्या तीन पद्धती आहेत. यातील पहिली पद्धत म्हणजे निकाल लागल्यावर मिळालेल्या टक्क्यांनुसार कला-वाणिज्य-विज्ञान या शाखेची निवड करणे! दुसरी पद्धत म्हणजे नातेवाईकांच्या रेटय़ाला बळी पडणे आणि तिसरी पद्धत म्हणजे मित्र कोणत्या शाखेसाठी जात आहेत, ते पाहूनच आपली शाखा निवडणे! मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे तीनही मार्ग प्रचंड घातक आहेत.
टक्के हा काही करिअर निवडीचा मार्ग असू शकत नाही. अमुक अमुक टक्के मिळाले, म्हणजे तुम्ही विज्ञान शाखेचीच निवड करायला हवी, असे अजिबात नाही. उलट जास्त टक्के असले आणि विज्ञान शाखेची आवड नसली, तर बिनदिक्कत इतर शाखा निवडावी. शाखा निवडताना प्रत्येक विद्यार्थ्यांने तीन कोष्टके तयार करावीत. शाळेत आपल्याला अभ्यास करण्यासाठी सर्वात जास्त आवडणारे, झेपणारे विषय, मध्यम आवडणारे, झेपणारे विषय आणि अजिबात न आवडणारे व झेपणारे विषय! या तीन कोष्टकांत शाळेतील आपले विषय बसवावेत. सर्वात जास्त आवडणारे विषय आणि तुम्हाला दहावीत मिळालेले टक्के, यांचे समीकरण जुळले, तर मग त्या शाखेची निवड करावी. 
हा झाला करिअर अथवा शाखा निवडीचा सोपा मार्ग! पण शास्त्रशुद्ध मार्गाने शाखा निवडायची असेल, तर मग अभिक्षमता चाचणी किंवा कल चाचणी हा उत्तम उपाय आहे. आता वर्षभर आधीच चाचण्या देऊन वैतागलेली दहावी-बारावीची मुले, 'ही कोणती बुवा नवीन चाचणी!' असे म्हणतात. पण ही अतिशय सोपी चाचणी आहे. ही चाचणी देण्यासाठी कोणत्याही अभ्यासाची गरज नसते. किंबहुना पाटी जेवढी कोरी ठेवाल, तेवढा तुमचा फायदा होईल. बरे, या चाचणीतील सकारात्मक मुद्दे नाही घेतलेत, तरी नकारात्मक मुद्दय़ांकडे नीट लक्ष द्या! तेवढे बाजूला ठेवून जे उरेल, त्याची निवड डोळे झाकून करा! पण तुमचा निर्णय निकाल लागण्याआधी होणे आवश्यक आहे.
आजकालच्या पालकांचे मला एक कळत नाही. सगळे पालक आपल्या मुलांबद्दल हमखास एकच गोष्ट सांगतात. 'डोकं अफाट आहे हो, पण अभ्यास करत नाही.' सगळ्यांचीच डोकी अफाट आणि सगळेच अभ्यास करत नाहीत! छान आहे. 'नाही हो, माझ्या मुलाची आकलनक्षमता तुलनेने कमी आहे,' असे सांगणारा माणूस लाखांतून एक सापडतो. पालकांनीही मुलांना त्यांची 'डोकी' स्वत: जोखण्याची संधी द्यायला हवी. मुलांनीही स्वत:चे विश्लेषण प्रामाणिकपणे करायला हवे. त्यानंतरच पुढील मार्ग जास्त सोपा होईल. 
आता आपण करिअरच्या काही मार्गाकडे पाहू या. करिअरचे काही मार्ग थेट दहावीनंतरच उघडे होतात. त्यातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे आयटीआय! एके काळी आयटीआयला फारशी प्रतिष्ठा नव्हती. आयटीआयमध्ये शिकलेला मुलगा म्हणजे कामगार श्रेणीतील, असा एक समज होता. मात्र आयटीआय हा जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकवणारा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आहे. आता तर अनेक प्रतिष्ठित कंपन्यांनी काही आयटीआय दत्तक घेतले आहेत. त्यामुळे या कंपन्यांना लागणारे तंत्रकुशल मनुष्यबळ आयटीआयमधून तयार होते. परिणामी, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर थेट नोकरी मिळण्याचीही शक्यता वाढते. तसेच आता आयटीआय पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे शक्य बनले आहे. दहावीनंतर आणि बारावीपर्यंत व्होकेशनल अभ्यासक्रम, हादेखील उत्तम पर्याय आहे. 
होमसायन्स या अभ्यासक्रमाकडे आज अनुल्लेखाने बघितले जाते. वास्तविक मुलींसाठी हा अभ्यासक्रम उत्तम आहे. या अभ्यासक्रमात जीवनकौशल्ये शिकवली जातात. त्यात अंतर्गत सजावटीपासून स्वयंपाकापर्यंतच्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात. हा पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. त्यानंतर कार्यक्षेत्राची अनेक कवाडे उघडू शकतात.
आपल्याकडे मुलांची चित्रकला, रांगोळी आदी गुण अगदी नववीपर्यंत वाखाणले- मिरवले जातात. पण जसे दहावीचे वर्ष सुरू होते, तसा पालकांचा सूर बदलतो. 'बस करा रंग उधळणं, अभ्यास करा,' अशी तंबी दिली जाते. पण हीच कला पुढे आयुष्यात करिअर बनू शकते, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते. पण 'फाइन आर्ट्स' या विषयात डिप्लोमा केलेल्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. यात मल्टिमीडिया अ‍ॅनिमेशनसाठी लागणारी अनेक कौशल्ये या डिप्लोमामध्ये शिकता येतात. सध्या मल्टिमीडिया अ‍ॅनिमेशन या प्रकाराला खूपच मागणी आहे.
दहावीनंतर अभियांत्रिकी शाखेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत. सर्वप्रथम आपण फायदे बघू या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहावीमध्ये चांगले गुण मिळाले असल्यास डिप्लोमासाठी उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळण्यात अडचण येत नाही. तसेच बारावीनंतर सीईटी, जेईई आदी परीक्षा देण्याची गरज पडत नाही. डिप्लोमा झाल्यावर डिग्रीच्या थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेणे शक्य असल्याने डिप्लोमानंतर डिग्री करण्याचा पर्यायही खुला राहतो. डिप्लोमामध्ये अभियांत्रिकीचा पाया पक्का झाल्यास डिग्री अभ्यासक्रमाला सामोरे जाणे सोपे होते. आणखी महत्त्वाचे म्हणजे अभियांत्रिकी डिप्लोमाच्या बळावर रेल्वेपासून लष्करापर्यंत आणि खासगी कंपन्यांतही नोकरी मिळू शकते. दहावीनंतर थेट डिप्लोमा करण्याचे काही तोटेही आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्यांनी आपल्या करिअरबद्दल विचार केलेला नाही, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम नाही. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणा किंवा एक अट म्हणा, डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षांला तुम्हाला उत्तम गुण मिळाले, तरच तुम्हाला डिग्रीसाठी चांगले महाविद्यालय वा संस्था मिळू शकेल.
शेवटी विद्यार्थ्यांनी कोणतेही करिअर निवडले, तरी त्यात झोकून देऊन काम करण्याची तयारी ठेवायला हवी. त्याबाबत त्यांनी अमिताभ बच्चन 
यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवायला हवे. ४५ वर्षे करिअर करूनही त्यांची तळमळ अजूनही कमी झालेली नाही. शेवटी 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील एक संवाद सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा, 'कामयाबी के पीछे मत भागो, काबील बनों.. कामयाबी पीछे आएगी'


विज्ञान- तंत्रज्ञानाच्या वाटा हजार

विज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र यापलीकडेही अनेक कवाडे खुली असतात..

* वैद्यक शाखेला जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी देशपातळीवरील 'एआयपीएमटी'ची सीईटी देणे अत्यावश्यक आहे. देशभरातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील १५ टक्के जागा या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात.
* पशुवैद्यक हा अभ्यासक्रम सध्या दुर्लक्षित असला, तरी त्याला जागतिक स्तरावर आणि आपल्याकडेही उत्तम मागणी आहे. देशाबाहेरही उत्तम संधी असलेल्या या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने वळायला हवे.
* फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि बी.एस्सी. नर्सिग हे तीन अभ्यासक्रम मुलींसाठी उत्तम अभ्यासक्रम आहेत. नर्सिग केलेल्या मुलींना परदेशांतही उत्तम संधी मिळते. नर्सिग क्षेत्राद्वारे देशाबाहेर जाणाऱ्या मुलींची संख्या सॉफ्टवेअर अभियंत्यांपेक्षाही जास्त आहे.
* महाराष्ट्रात सध्या अभियांत्रिकी शाखेतील ७० प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात पेट्रोलियम अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, ऊर्जा अभियांत्रिकी अशा अनेक शाखांचा समावेश आहे. नजिकच्या भविष्यकाळात महत्त्व प्राप्त होणाऱ्या या शाखांचा विचारही विद्यार्थ्यांनी करायला हवा.
* र्मचट नेव्ही हेदेखील एक साहसी करिअर विज्ञान शाखेतील मुलांना खुले आहे. मात्र, हे क्षेत्र इतरांहून वेगळे आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क जास्त असले, तरी नंतर या नोकरीचे वेतनही त्याच पटीत भरभक्कम मिळते. 
* वैमानिक होणे, ही अनेकांची महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी बारावीत विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र- रसायनशास्त्र आणि गणित हा अभ्यासगट घेणे आवश्यक आहे. अनेक खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्था यासंबंधीचे प्रशिक्षण देतात. त्यात रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान संस्था ही अग्रणी संस्था आहे. 
* अवकाश संशोधनामध्ये जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी इस्रो संस्थेत प्रशिक्षण घेता येते. मात्र, तेथील प्रवेशासाठी त्रिवेंद्रम येथील आयआयएसटी या संस्थेत प्रवेश मिळवणे योग्य ठरते. बारावीनंतर या संस्थेमार्फत चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. मात्र, संस्थेत प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स आणि बारावीचे गुण एकत्रितपणे ग्राहय़ धरले जातात. 
* विज्ञान शाखेत संशोधन करायचे असल्यास प्रशिक्षणाचे अनेक मार्ग खुले आहेत. आयआयएसईआर या संस्थेमध्ये पाच वर्षांचा संशोधन अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात ५० टक्के जागा बारावीच्या गुणांवर मिळतात. या अभ्यासक्रमाबरोबर एनआयएसइआर संस्थेतही संशोधनासाठी अभ्यासक्रम आहेत. 
* दहावीनंतर पुढील किमान दहा वर्षे शिकण्यात स्वारस्य आणि आर्थिक पाठबळ असलेल्यांना बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात संशोधन करण्याचा पर्याय निवडता येईल. या क्षेत्रात एम.एस्सी. आणि पीएच.डी. या पदव्या घेऊन पुढे संशोधन करता येऊ शकते.


विद्याशाखा कोणतीही असो..

करिअरचे अनेक पर्याय असेही आहेत, ज्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून शिक्षण घेत असलात, तरी काहीच फरक पडत नाही. म्हणजे कला-वाणिज्य-विज्ञान अशा कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमांची दारे उघडू शकतील..
* विधि या विषयात करिअर करायचे असेल, तर बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी बारावीनंतर सीएलएटी ही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर देशातील विविध शहरांत असलेल्या या नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेऊन तुम्ही करिअरची वाट निवडू शकता.
* हॉटेल मॅनेजमेण्ट या क्षेत्रालाही शाखेचे बंधन नाही. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी बारावीनंतर या अभ्याक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. मात्र, त्याकरता राष्ट्रीय पातळीवरील सीईटी देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राच्या स्वतंत्र सीईटीत उत्तीर्ण झालात तर राज्यभरातील नामांकित संस्थांमधून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. त्याशिवाय हॉटेल मॅनेजमेण्टचा तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्याक्रमही अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे.
* चित्रकलेत गती असलेल्या आणि गणित उत्तम असलेल्या विद्यार्थ्यांना वास्तूशास्त्र या विषयातही करिअर घडवता येईल. त्यासाठी बारावीनंतर नाटा ही परीक्षा द्यावी लागते. 
* बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स या पदवीसाठीही सीईटी परीक्षा होते. हा पर्याय सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना खुला आहे.
* डिझायनिंग या विषयात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डिझायनिंगमध्येही इंटिरिअर, फॅशन, प्रॉडक्ट असे अनेक प्रकार आहेत. अहमदाबादची नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायनिंग ही संस्था या अभ्यासक्रमासाठी सर्वोत्तम आहे. या संस्थेच्या प्रवेशासाठी बारावीनंतर प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ं
* मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता या अभ्यासक्रमांसाठीही बारावीनंतर कवाडे खुली होतात. त्यासाठी विद्याशाखेची अट नाही. 
* सर्व विद्याशाखांच्या पदवीधरांना यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन अशा स्पर्धा परीक्षा देता येतात.



करिअरमधील यशासाठी'सॉफ्ट स्किल्स'आवश्यक! लोकसत्ता करिअर वृत्तान्त मुंबई दिनांक सोमवार ८ जून २०१५

दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरची दिशा सुस्पष्ट व्हावी, याकरता २९ व ३० मे रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स यांच्या सहकार्याने  'लोकसत्ता मार्ग यशाचा' या  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले. या परिसंवादात करिअर निवडीसंबंधित विविध पैलूंबाबत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश देत आहोत..

गौरी खेर
संस्थापक, हॉस्पिटॅलिटी कोरम


एकाच प्रकारचे शिक्षण घेऊनही काहीजण अधिक यशस्वी होतात आणि काही मागे पडतात, याचे कारण सॉफ्ट स्किल्समध्ये दडलेले आहे. सॉफ्ट स्किल्समध्ये नेतृत्वगुण, वर्तणूक, सहनशीलता, समोरच्याचे ऐकून घेण्याचे कौशल्य, संभाषणचातुर्य अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो, ज्या यशस्वी जीवन जगण्यासाठी 
आवश्यक असतात. 
'फिक्की' या संघटनेच्या 'इंडिया स्किल रिपोर्ट २०१४'मध्ये आपल्या देशातील एकूण पदवीधरांपैकी ५० टक्के पदवीधर नोकरीच्या बाजारपेठेत अपात्र ठरतात आणि त्यामागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सॉफ्ट स्किल्सचा अभाव, असे नमूद केले आहे. यातूनच 'सॉफ्ट स्किल्स'चे महत्त्व अधोरेखित होते. 
१९९०च्या जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या कॉर्पोरेट क्षेत्रात बराच बदल झाला. भारतात पाऊल रोवणाऱ्या परदेशी कंपन्यांची कार्यसंस्कृती वेगळी होती. भाषा, संस्कृती वेगळी असणाऱ्या कर्मचारीवर्गात समन्वय राखण्यासाठी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सॉफ्ट स्किल्सच्या प्रशिक्षणाची गरज 
भासू लागली. या नव्या कार्यसंस्कृतीने आपल्या कामाच्या अनेक संकल्पना मूळापासून बदलल्या. आजच्या काळात तुम्ही 'अपडेटेड' नसाल तर लवकरच 'आऊटडेटेड' होता, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. 
प्रत्यक्ष काम करण्यासाठी लागतात ती 'हार्ड स्किल्स'. ती आपल्याला अभ्यासक्रमातून, शिक्षणातून मिळतात. मात्र, या व्यतिरिक्त व्यक्तिमत्त्वाशी संबंधित जी काही कौशल्ये असतात, ती म्हणजे सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्समुळे आपल्या 'हार्ड स्किल्स'ना चकाकी येते.
भावनिक बुद्धिमत्ता आणि सॉफ्ट स्किल्समुळे आपल्या करिअरची वाट सुकर बनते. संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, तणाव व्यवस्थापन, वाटाघाटींचे कौशल्य, श्रवणकौशल्य या कौशल्यांचे महत्त्व महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच लक्षात घ्यायला हवे. आजच्या कॉर्पोरेट जगतात काही एटिकेट पाळणे नितांत आवश्यक असते. आपली देहबोली, हावभाव याविषयीचे मॅनरिझम कटाक्षाने पाळावे लागतात. फोनवर बोलण्याचे संकेत, ई-मेल एटिकेट मुलांनी माहिती करून घ्यायला हवेत. सीव्ही कसा लिहावा, मुलाखत देताना कुठल्या गोष्टींचे भान ठेवावे, गटचर्चेत आपली कामगिरी उंचावण्यासाठी काय करता येईल, हे विद्यार्थिदशेत जाणून घेणे त्यांच्या पुढच्या करिअरला पूरक ठरते. सोशल मीडियातील तुमच्या वावरावरही कंपन्यांची नजर असते, हे मुलांनी लक्षात ठेवायला हवे. वागण्या-बोलण्याचे हे सारे संकेत जाणून घेणे कॅम्पसमधून थेट कॉर्पोरेट जगतात उडी मारताना अत्यावश्यक ठरतात.
आज इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे अनिवार्य आहे. इंग्रजीतून संवाद साधण्यासोबतच व्यापारविषयक वाटाघाटी, ई-मेल अथवा अहवाल लेखन आणि सादरीकरणासाठी इंग्रजी भाषेवर पकड मिळवणे आजच्या कॉर्पोरेट जगतात महत्त्वाचे आहे. 
सॉफ्ट स्किल्स ही जीवन कौशल्ये असतात. ती आपल्याला जन्मभर पुरतात. ती एखाद्या कार्यशाळेतील सहभागाने साध्य होत नाहीत तर त्यावर आपल्याला सतत काम करावं लागतं. जितके तुम्ही घरच्या सुरक्षित वातावरणाच्या पलीकडे झेपावत बाहेरच्या जगाचा अनुभव घ्याल, तितक्या या गोष्टी तुमच्यात अधिकाधिक विकसित होतील. जितक्या उत्साहाने आणि पुढाकार घेऊन तुम्ही नव्या गोष्टी शिकाल किंवा अनुभवाल तितका त्याचा अधिक लाभ तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये होईल. त्यासाठी छंद जोपासा. लहान-मोठे अभ्यासक्रम शिका. शिक्षण घेतानाच आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कामाचा अनुभव घ्या. काम केल्याने परिपक्वता येते. आपला र्सवकष दृष्टिकोन विकसित व्हायला यामुळे मदत होते. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे किंवा ज्यात करिअर करायचे आहे, अशा क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव किंवा अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी केलेला संवाद उपयोगी पडतो. पालकांनीही मुलांच्या या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. याला लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग म्हणून हिणवू नये. 
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतल्यानेही व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडतात. कुठल्याही प्रकारची कार्यशाळा व प्रशिक्षण न घेता हे साध्य करता येते. महाविद्यालयीन व आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा, नाटय़ स्पर्धा, गिर्यारोहण मोहिमा यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे अशा कितीतरी गोष्टी महाविद्यालयीन वर्षांमध्ये तुम्हाला करता येतील आणि या गोष्टी तुमच्या 'सीव्ही'वर कायम राहतील, हे ध्यानात घ्या. 
सॉफ्ट स्किल्स विकसित करण्याच्या दृष्टीने अफाट वाचन उपयुक्त ठरते. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने जग जिंकले अशा व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचल्यानेही आपला दृष्टिकोन विस्तारण्यास 
मदत होते. नोकरीच नव्हे तर व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनादेखील याचा फायदा होतो. आपले वक्तव्य, सादरीकरण कसे असावे याकरता 'यूटय़ूब'वरील 'टेड टॉक' जरूर बघा, ऐका. 
एखाद्या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करण्याचा अनुभवही आपल्याला बरेच काही शिकवून जातो. या संस्थांच्या निमित्ताने फिल्ड व्हिजिटचा अनुभव मिळतो. कुठल्या कामातून, अनुभवातून तुम्हाला तुमचे खरे करिअर सापडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे, सतत नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. अशा सवयी स्वत:ला जडवा, ज्या तुम्हाला तुमच्या अभ्यासात आणि नंतर करिअरमध्ये उपयोगी पडतील. उदा. वेळेचे व्यवस्थापन, नियमित व्यायाम.
करिअरला उपयोगी ठरणाऱ्या या सॉफ्ट स्किल्सच्या विकासासाठी महाविद्यालयीन वर्षांमध्येच गुंतवणूक करा. जेणेकरून याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला शिक्षण झाल्यावर नोकरीच्या बाजारपेठेत उतरल्यानंतर जाणवतील. सॉफ्ट स्किल्समुळे तुमच्या अंगभूत गुणांना अधिक झळाळी येते आणि तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध बनतं..


क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडा.. लोकसत्ता करिअर वृत्तान्त मुंबई दिनांक सोमवार ८ जून २०१५

दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरची दिशा सुस्पष्ट व्हावी, याकरता २९ व ३० मे रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स यांच्या सहकार्याने  'लोकसत्ता मार्ग यशाचा' या  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले. या परिसंवादात करिअर निवडीसंबंधित विविध पैलूंबाबत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश देत आहोत..

नीलिमा आपटे
अभिक्षमता मापन विभाग प्रमुखज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थापुणे

अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट करण्याचं योग्य वय म्हणजे १४-१५ या वयोगटातील मुलं. म्हणजेच विद्यार्थी नववी-दहावीत जातो ते वय. कारण तोपर्यंत मुलाच्या विविध क्षमतांचा विकास सुरू असतो. 
अभ्यासक्रम निवडताना कल, आवड आणि क्षमता या त्रयींचा विचार करावा लागतो. अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमुळे आपल्या क्षमता जाणून घेता येतात आणि ज्या क्षमता विकसित झालेल्या नाहीत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करता येतात.
गुणांच्या टक्केवारीवर विद्यार्थी अभ्यासक्रम निवडतात. पण अभ्यासक्रम निवडताना केवळ हा एकमेव निकष मानू नये. त्या विषयाची आवड, गती आणि आपल्याला तो अभ्यासक्रम पुढे कितपत झेपेल याचाही विचार व्हायला हवा. अभ्यासक्रम निवडताना मुलांनी पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या अथवा नातेवाईकांच्या अपेक्षांचे ओझे बाळगू नये आणि पालकांनीही मुलांना हे ओझे अजिबात येणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी मुले आणि पालकांमध्ये सुसंवाद असायला हवा. या सुसंवादातून दहावी-बारावीच्या वर्षांत अभ्यासाचा, परीक्षेच्या निकालाचा आणि नंतर अभ्यासक्रम निवडीचा जो अवाजवी ताण निर्माण झालेला असतो तो निवळण्यास मदत होते. मूल पुढे काय शिकू इच्छिते हे पालकांनी समजून घ्यायला हवे आणि मूल निवडू इच्छिणाऱ्या अभ्यासक्रमाबाबतची वास्तव परिस्थिती पालकांनी जाणून घ्यायला हवी. म्हणजे तो अभ्यासक्रम त्याला झेपेल का, अभ्यासक्रमाची फी, घरची आर्थिक परिस्थिती वगैरे.. हे सारे केवळ मुलं आणि पालक यांच्या सुसंवादातूनच शक्य होते.
टीनएजमध्ये मुलांवर मित्रमैत्रिणींचा प्रभाव अधिक असतो. मात्र, मित्रमैत्रिणींनी निवडला, म्हणून तोच अभ्यासक्रम तुम्ही निवडू नका. तुम्हाला जे रुचतं, पेलतं ते करा. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्याची माहिती आतापासूनच करून घ्या. त्या क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधल्यास खूप माहिती मिळते. फावल्या वेळात त्या क्षेत्रांविषयी वाचा तसेच सुटीच्या दिवसांत त्या क्षेत्रात कामाचा अनुभव मिळाला तर अवश्य घ्या. असा कामाचा अनुभव तुम्हाला पुढे नक्की उपयोगी पडतो. 
ज्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, त्या क्षेत्रातील उपशाखांची, वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची माहिती याची माहिती करून घेणे केव्हाही चांगले. 
अभ्यासक्रम निवडताना आपला स्वभावधर्म काय आहे ते समजून उमजून निवडा. काहींना जखमा, रक्त पाहिल्यानंतर भीती वाटते. त्यांनी जर वैद्यकीय क्षेत्र निवडले तर त्यांना त्रास होऊ शकतो. अर्थात ही भीती घालविण्याचेही अनेक पर्याय असतात. अत्यंत भावनाप्रधान असणारी व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञ झाल्यास काम करताना त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. करिअर निवडताना तो आपल्या व्यक्तिमत्त्वाशी मिळताजुळता हवा. एखादा अभ्यासक्रम निवडताना त्या क्षेत्रात आवश्यक ठरणाऱ्या क्षमता आपल्यात आहेत का, याकडे लक्ष द्या. जर एखाद्या विद्यार्थ्यांला अभियांत्रिकी शाखेत जायचे असेल तर त्यासाठी आवश्यक ठरणारे तांत्रिक गोष्टी शिकण्याची आवड आणि कल आपल्यात आहे का याचा विचार व्हायला हवा.
जर दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मनासारखे गुण मिळाले नाहीत तर त्यामुळे कोमेजून जाण्याचे कारण नाही. पालकांनीही अभ्यासाच्या पलीकडे आपल्या पाल्यात कुठल्या क्षमता आहेत, हे लक्षात घ्यायला हवं आणि त्यानुसार ज्या क्षेत्रात त्याला गती आणि आवड असेल तिथे जाण्यासाठी मुलाला उत्तेजन द्यायला हवं. 
अनेकदा या परीक्षांमध्ये मुलांना आलेल्या अपयशाचे कारण हे त्यांना या परीक्षांची वाटणारी भीती आणि त्यामुळे अभ्यासाचा आलेला तणाव हा असतो. अशा तणावाचा सामना मुलांना करायला लागू नये, यासाठी मुलांनी अभ्यासाचे नियोजन करायला हवे. त्याखेरीज दहावी-बारावीच्या वर्षांत तणाव निवळण्यासाठी नियमित व्यायाम, खेळ आणि छंदांचा मोठा उपयोग होतो. खेळ, व्यायाम, छंदाची जोपासना यामुळे ताजतवानं व्हायला मदत होते. त्यामुळे 'अभ्यास एके अभ्यास'चा अट्टहास मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी बाजूला ठेवायला हवा. मात्र, तरीही काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावामुळे घाबरेघुबरे होणे, काहीही न आठवणे अथवा वारंवार आजारी पडणे असे होते. अशा वेळी समुपदेशकाची अथवा वैद्यकतज्ज्ञाची मदत घ्यायला हवी. 
दहावीनंतरच्या पुढच्या अभ्यासात स्वयंअध्ययन महत्त्वाचे असते. त्यात विद्यार्थ्यांने पाठांतरापेक्षा विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घ्यायला हव्या. जर त्या विषयात रुची असेल तर स्वयंअध्ययनही उत्तम जमते. अन्यथा, स्वयंअध्ययनाअभावी विद्यार्थ्यांची फरफट होते आणि अभ्यासात मागे पडल्याने मुलांना नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव अशा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर घाला घालणाऱ्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच विद्याशाखेची अथवा अभ्यासक्रमांची निवड विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
पूर्ण विचारांती एखादा अभ्यासक्रम निवडला तर त्यात यश मिळवणं हे केवळ विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. जिद्द आणि कठोर मेहनतीला पर्याय नाही. इंटरनेटचा आणि स्मार्टफोनचा अतिवापर प्रगतीच्या आड येतो, याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवायला हवे. 
दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक अत्यंत व्यग्र आणि तणावपूर्ण असते. अभ्यासाचा ताण, थकवा दूर करण्यासाठी घरचा समतोल आहार आवश्यक असतो. अन्यथा, मुलांची चिडचिड, आरडाओरडा, थकवा असे प्रकार होतात.
प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता वेगळी असते, हे लक्षात घेत करिअरची निवड करायला हवी. अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांना व्यावसायिक शिक्षणाद्वारे स्वावलंबी बनविण्याचा मार्ग उपलब्ध आहे. ज्या मुलांना अभियांत्रिकीसारख्या विद्याशाखेत जायचं आहे, त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, एकदा का प्रवेश मिळाला की काम फत्ते, असे नसते. कारण अभियांत्रिकीच्या प्रत्येक वर्षी निकालामध्ये सातत्य लागते. दरवर्षी गुणांचा आलेख प्रथम श्रेणीत असलात तरच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींचा लाभ घेता येईल. 
क्रमिक अभ्यासासोबत व्यवहारज्ञान, इतरांच्या भावना समजून घेणे या भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला हव्या. माणसं ओळखण्याचे कसब मुलांना जमायला हवं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भावभावनांचे व्यवस्थापन मुलांना करता यायला हवे.